महिला सक्षमीकरण: सक्षम 'स्व'रक्षणाय - मैत्रेयी प्रतिभा प्रदीप

महिला सक्षमीकरण: सक्षम 'स्व'रक्षणाय - मैत्रेयी प्रतिभा प्रदीप

बदल हे एक शाश्वत सत्य आहे. काळ बदलतो तसे मानवजीवन कधीकाधीक समृद्ध होत जाते. उत्क्रांती पासून आजतागायत मानवी जीवन अन् त्याचे जीवनमुल्य यात अनेक बदल झाल्याचा दावा आपण करतो. क्रांतिकारी संशोधनामुळे ते सुसह्य झाले आहे. बटन दाबले म्हणजे कामे होतील असे आजचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. असे असले, तरी त्यामुळे अद्याप समाज मानसिकता बदलण्याचे काम होऊ शकलेले नाही. स्त्री-पुरुष समानता केवळ गप्पामध्येच येत आहेत. प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना चित्र काही वेगळेच आहे. स्त्री हा आजही समाजाचा एक दुय्यम घटक अनेक ठिकाणी मानला जातो. तिच्यामधील क्षमतांवर आजही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनेकजण आहेत! आकाशाला गवसणी घालून येणाऱ्या कल्पना चावला सारख्या धाडसी कन्या असल्या तरी समाजच्या गलिच्छ नजरेपासून स्वतःला वाचवू पाहणाऱ्या कितीतरी निर्भयादेखील आहेत, ज्यांना समाजात निर्भयपणे वावरणे ही केवळ एक कपोलकल्पित गोष्ट वाटायला लागली आहे. महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. विविध सामाजिक संस्था महिलांच्या मदतीसाठी धावून येत आहेत. बदलत्या काळासोबत तंत्रज्ञानाची मदत घेतली जात असली तरी ती केवळ शहरी भागातच मर्यादित आहे, ते देखील विकसनशील स्थितीमध्ये! कारण तंत्रज्ञान कशाशी खातात हेच अजून शहरेतर भागांमध्ये माहिती नाही, किंवा अगदी अल्प प्रमाणात. तंत्रज्ञानाच्या मदतीने आज अनेक गोष्टी आणि मदती मिळवणे सोईचे झाले असले तरी त्याची ठोस कल्पना महिलावर्गात आहे का? खरंच गरज पडल्यास त्यांना मदत मागता येते का? ती तेवढीच तातडीने मिळते का? हे मोठे प्रश्न आहेत. आणि त्या निरागस कळ्यांचे काय ज्यांना ती स्त्री आहे या गोष्टीची जाणीव होण्याच्या आतच त्या खुडल्या नव्हे नव्हे उखडल्या जातात!! शासनाने अशा महिलांसाठी व महिला सुरक्षेसाठी अनेक कायदे केले आहेत. पण त्याची योग्य वेळ असता अंमलबजावणी होणे हेही तितकेच महत्वाचे नाही का? मुळात अंमलात आणल्या गेलेल्या कायद्यांचा धाक जनमानसात राहिलेला नाही अशी काहीशी परिस्थिती दृष्टीक्षेपात येत आहे. कायद्याचा जरब हवा तसा राहिलेला नाही, आणि त्यामुळे सर्वत्र असुरक्षितेची भावना वाढीस लागते आहे. केवळ मुलगी आहे या एका गोष्टीमुळे ती घरातुन बाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत घरच्यांना काळजी लागून राहिलेली असते. अशा सततच्या असुरक्षित वातावरणामुळे आजची झेप घेत असलेली मुलगी बिचकते आहे किंबहुना तिच्या स्वतःमधली असणारी आत्मनिर्भरता ती विसरू लागली आहे. त्यामुळे कायद्याच्या तरतुदी अन् त्यातील शिक्षा कठोर करणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल असे अनेकांचे मत आहे. पण ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या आधी आपल्या बेटीला सक्षम बनवणे महत्वाचे आहे. आणि या सगळ्यापालिकडे जाऊन खरे तर स्त्रीयांनी देखील स्वतःची मानसिकता खंबीर करणे गरजेचे आहे. कारण अत्याचार करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा तो सहन करणारा त्याला खतपाणी घालण्यास कुठेतरी जबाबदार असतो.

होणारा अत्याचार निमूटपणे सहन करणे किंवा आपलीच चूक आहे अशा न्यूनगंडामधून स्वतःला पडद्याआड लपवणे हा उपाय नाही. बुरख्याआड दडूनही विकृत मानसिकतेच्या नजरेपासून स्वतःचा बाजाव करण्यात स्त्री कमी पडत आहे. त्यामुळे पडद्याआड जाणे किंवा आपल्या संरक्षणासाठी सरकार, कायदा वा अन्य कोणावरही विसंबून राहणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. कारण रक्षकच भक्षक झाल्याची उदाहरणे देखील कमी नाहीत. त्यामुळे गरज आहे ती स्वतः स्वसंरक्षणासाठी सिद्ध होण्याची, पडद्याआड राहून राहून झोपी गेलेल्या सिंहिणीला जागृत करण्याची! आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराचे स्वतः रणरागिणी होऊन सडेतोड उत्तर देण्याची! स्वतःचे रक्षण करणे बालपणापासूनच तिला शिकवणे आणि ‘ती’ एक मनुष्य आहे ही तिच्याकडे बघण्याची निर्मळ नजर ‘त्याला’ शिकवणे ही आज बदलत्या काळाची गरज आहे. बालपणी ‘स’ संसाराचा शिकवण्याआधी ‘स’ सक्षमतेचा शिकवणे महत्वाचे आहे. जेव्हा स्त्री स्वतः सक्षम होईल, आणि खंबीरपणे उत्तर द्यायला शिकेल तेव्हा तिच्यावरच्या एका वाईट नजरेकडे तिने टाकलेला कटाक्षच तिच्या संरक्षणाची ढाल बनून तिचे रक्षण करेल यात तिळमात्र शंका नाही!

-मैत्रेयी प्रतिभा प्रदीप


comments powered by Disqus