कविता: माणूसकी जळते आहे - विलास गायकवाड, लातूर

कविता: माणूसकी जळते आहे - विलास गायकवाड, लातूर

रस्त्यांवर घडलेल्या अपघातात
तडफणारा जीव पाहूनी
फोटो काढणारे पाहिले की,
वाटते इथे माणूसकीच जळते आहे.

दिवसाढवळ्या रस्त्यांवर कधी कधी,
अबलांवर होणारा अत्याचार
पहात बसलेले पाहिले की,
वाटते इथे माणूसकीच जळते आहे.

मंदिरात होते अभिषेक दुधाचा,
तिथंच भुकेने व्याकूळलेले जीव.
याचना अन्नाची करतांना पाहिले की,
वाटते इथे माणूसकीच जळते आहे.

चौकाचौकात नाहक जमलेले,
मानवरूपी गिधाडांचे थवे
घुटमळतांना पाहिले की,
वाटते इथे माणूसकीच जळते आहे.

लोकशाहीत हे घडतेय सारे,
ना राहिला कायद्याचा धाक जिथे.
स्वातंत्र्य जगण्याचे संपतांना पाहिले की,
वाटते तेव्हा…
इथे लोकशाही सुद्धा जळते आहे .


comments powered by Disqus